मणिपूरमध्ये भाजप सरकार स्थापनेच्या तयारीत   

इंफाळ : मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापनेच्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. भाजप आमदार थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी नऊ आमदारांसह राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर ४४ आमदार नवीन सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे, असे सिंह यांनी सांगितले.
 
मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष केशम मेघचंद्र यांनी मणिपूरमध्ये शांतता राखण्यात राष्ट्रपती राजवट अपयशी ठरली, असा आरोप केला होता. तसेच, राज्यपाल अजय कुमार भल्ला यांना केंद्राने परत बोलावावे,असेही म्हटले होते.मणिपूरमध्ये मे २०२३ मध्ये आरक्षणाच्या मुद्दावरुन वांशिक हिंसाचार उसळला होता. तेव्हापासून मैतेई आणि कुकी समुदायात जातीय संघर्ष पेटला असून मणिपूर अशांत आहे. या हिंसाचारात २६० हून अधिक जणांना प्राण गमवावे लागले असून हजार नागरिकांना घर सोडावे लागले आहे.
 
मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.आता भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात भाजप आमदार सिंह म्हणाले, आम्ही राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले. ते लवकरच मणिपूरच्या हिताचा निर्णय घेतील, असे सांगितले. भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार का? असे विचारले असता, याबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल, असे सांगितले. पण, त्याचवेळी आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार आहोत म्हणजे सरकार स्थापनेचा दावा करण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले. 
 
विधानसभा अध्यक्ष सत्यव्रत यांनी ४४ आमदारांची वैयक्तिक आणि संयुक्तपणे भेट घेतली. कोणीही नवीन सरकार स्थापनेस विरोध केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागील काही वर्षांत मणिपूरमधील जनतेला अनेक अडचणींचा सामोरे जावे लागले. आधी कोरोना महामारीमुळे दोन वर्षे वाया गेली. त्यानंतर, वांशिक हिंसाचार उफाळून आला. त्यात, दोन वर्षे वाया गेली. आता राष्ट्रपती राजवट लागू आहे, असेही सिंह म्हणाले. साठ सदस्यांच्या विधानसभेत सध्या ५९ आमदार आहेत. एका आमदाराच्या मृत्युमुळे एक जागा रिकामी आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील युतीकडे ४४ आमदार आहेत. 
 

Related Articles